Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 

तब्बल ८४ तासांनी पालखी मंदिरात परतली 

नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 

तब्बल ८४ तासांनी पालखी मंदिरात परतली 
पालखीला एवढा वेळ ही मातेचीच इच्छा असल्याची भावना 

नागोठणे | महेश पवार

नागोठण्याची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराजांचा शुक्रवारी (दि.३)सकाळी साडेनऊ वाजता मोठ्या उत्साहात सुरु झालेला चैत्र पालखी सोहळा चौथ्या दिवशी सोमवारी (दि. ६) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर तब्बल ८४ तासांनंतर निर्विघ्नपणे पूर्ण झाला.  एप्रिल, २०२२ च्या पालखी सोहळ्याला ७५ तास लागल्यानंतर मागील दोन – तीन वर्षे पालखी सोहळ्याची वेळ ४८ ते ५५ तास अशी कमी करण्यात उत्सव समितीला यश आले होते. गेल्या वर्षी ६४ तासांत पालखी मंदिरात परतली होती.  मात्र त्यानंतर यावर्षी पालखी सोहळ्याची आतापर्यंतची सर्वात जास्त अशी ८४ तासांची वेळ नोंदली गेली आहे. पालखीला एवढा वेळ लागणे ही मातेचीच इच्छा असावी अशी भावनाही काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.  दरम्यान ग्रामदेवतेच्या पालखी सोहळ्याच्या चार दिवसांदरम्यान कुठेही वादग्रस्त घटना व अनुचित प्रकार न घडल्याने मिळालेल्या सहकार्याबद्दल उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर यांनी उत्सव समितीच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

नागोठण्याची  ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराजांची
पालखी ग्रामस्थांना दर्शनासाठी नागोठण्यातील सर्व भागांत नेण्यात आली. सर्वच ठिकाणी ग्रामस्थांनी तसेच तरूण-तरूणी, महिला व आबाल वृध्दांनी पालखीचे वाजत-गाजत- नाचत उत्साहात स्वागत केले.   या पालखी सोहळ्या निमित्ताने नागोठण्यातील परंतु नोकरी, व्यवसाया निमित्ताने गावाबाहेर असलेले चाकरमानी, ग्रामस्थ आणि माहेरवाशिणी गावात आवर्जून परतल्या होत्या. जोगेश्वरी मातेच्या या पालखी सोहळ्याच्या  निमित्ताने ग्रामस्थांना घरोघरी मातेचे दर्शन होणार असल्याने मातेच्या स्वागतासाठी सर्वत्र आकर्षक सजावाटी, रांगोळ्या काढून तसेच विद्युत रोषणाई करून स्वागतकमानी उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण गावात एक आनंदाचे, उत्साहाचे व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
फोटो : पालखी सोहळ्यात सहभागी झालेले राजिप सदस्य सुमितदादा काते व शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर तसेच इतर कार्यकर्ते 
हा पालखी सोहळा निर्विघ्नपणे यशस्वी होण्यासाठी जोगेश्वरी माता विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन, सचिव भाई टके, उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर, उपाध्यक्ष संतोष चितळकर, सचिव विवेक देशपांडे, सहसचिव अनिल पवार, सहखजिनदार सतीश पाटील, उत्सव समितीचे सदस्य पांडुरंग कोळी, दिगंबर खराडे, मच्छिंद्र साळुंखे, सुरेश गिजे, अनंत चितळकर, रोहिदास हातनोलकर, बाबू कोळी, पंकज कामथे, अल्विन नाकते, विशाल खंडागळे, संतोष पाटील, घनश्याम ताडकर आदींसह विश्वस्त समिती व उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली. पालखी मंदिरात पोचल्यानंतर ग्रामदेवतेच्या पालखी सोहळ्याला सहकार्य करणारे नागोठणे प्रत्येक आळीतील अध्यक्ष, हौसिंग सोसायट्यांचे अध्यक्ष, पोलीस ठाणे, नागोठणे ग्रामपंचायत, पत्रकार, वीज वितरण कंपनी, नागोठण्यातील अनेक संस्था, संघटना, सामजिक मंडळे तसेच या सर्वांचे उत्सव समितीच्या वतीने सत्कार करुन आभार व्यक्त करण्यात आले.
या पालखी सोहळ्या दरम्यान नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालखी सोहळ्याला कुठेही गालबोट न लागण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने नागोठणे पोलिस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
फोटो : कुंभार आळी ग्रामस्थ मंडळाचा सत्कार करतांना देवस्थान विश्वस्त समितीचे सचिव भाई टके सोबत उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर व ग्रामस्थ
माहेरवाशिणींचा व परगावावरून आलेल्या नागोठणेकरांचा हिरमोड
श्री जोगेश्वरी मातेच्या पालखी सोहळ्यानिमित्त माहेरवाशिणी माहेरच्या घरी येत असतात. मात्र पालखी सोहळ्यात डिजे वाजविण्यावर बंदी असतानाही  यावर्षी काही ठिकाणी नाचण्यासाठी खूप वेळ डीजे वाजविला गेला. पालखीच्या दोन्ही बाजूने दर्शन घेण्याच्या सूचना असतांनाही दोन्ही बाजूने दर्शनास निरुत्साह व महिलांची एकच बाजूला दर्शनासाठी इच्छा, फोटो काढण्यासाठी आणि नाचण्यासाठी पालखी खूप वेळ थांबविली गेली अशा या अनेक कारणांनी पालखी सर्वच ठिकाणी उशिराने पोचली. त्यामुळे आपल्या माहेरच्या घरासमोर पालखीचे दर्शन घेण्यासाठी एक दिवसासाठी आलेल्या माहेरवाशिणींना आणि नोकरी–व्यवसायानिमित्त परगावी राहणाऱ्या आणि एक दिवसाची सुट्टी काढून आलेल्या नागोठणेकरांना दुसऱ्या आळीत किंवा इतर ठिकाणी जाऊन पालखीचे दर्शन घ्यावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.  दरम्यान रोहा सारख्या मोठ्या शहरात श्री धावीर महाराजांचा पालखी सोहळा कमीत कमी वेळेत पूर्ण होत असतानाही नागोठण्यात पालखी सोहळा पूर्ण होण्यास चार दिवस व ८४ तास लागत असतील तर भविष्यात यावर सर्व ग्रामस्थांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत गावातील काही जाणकार व वरिष्ठ मंडळीकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!