E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण
सामंजस्य करार
कॅम्पस आणि उद्योग क्षेत्रातील दरी कमी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

एसएसओएसपी पॉलिटेक्निक व साधना नायट्रो केम लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार
कॅम्पस आणि उद्योग क्षेत्रातील दरी कमी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
नागोठणे | महेश पवार
भारतीय एज्युकेशन सोसायटी चॅरिटेबल ट्रस्टच्या शेठ श्री ओटरमल शेषमल परमार कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग (एसएसओएसपी पॉलिटेक्निक) नागोठणे आणि धाटाव (रोहा) येथील साधना नायट्रो केम लिमिटेड यांच्यात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि करिअर विकासासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
महाविद्यालयीन शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये यांच्यातील दरी कमी करणे तसेच विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रासाठी अधिक सक्षम बनवणे हा या सामंजस्य कराराचा प्रमुख उद्देश आहे. या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक ज्ञानासोबतच उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून डिप्लोमा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण, इंटर्नशिपच्या संधी, उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव आणि करिअरविषयक मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच उद्योगाच्या गरजा आणि बदलते तंत्रज्ञान यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळून त्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार तयार करणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून एसएसओएसपी पॉलिटेक्निक आणि साधना नायट्रो केम लिमिटेड यांच्यातील हा सामंजस्य करार विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या करिअरच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या सामंजस्य कराराच्या वेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष किशोरशेठ जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक जैन, प्राचार्य डॉ. प्रवेश यादव, साधना नायट्रोकेम कंपनीचे पी. अँड ए. चे मॅनेजर व्हि. एन. बेडेकर, कॉलेजचे रजिस्ट्रार वैभव नांदगावकर, मेकॅनिकल विभागप्रमुख विशाल पाटील, कंप्युटर विभागप्रमुख सागर सुरेकर, यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने एसएसओएसपी पॉलिटेक्निक आणि साधना नायट्रोकेम लिमिटेड यांच्यात हा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी जोडून त्यांच्या करिअरला योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम साकारण्यात आला. महाविद्यालय आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला असून, भविष्यात विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या औद्योगिक व करिअर संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही भागीदारी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.




