E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
खैरवाडी क्रॉसिंग बंद न करण्यासाठी ग्रामस्थांचे खा. सुनील तटकरेंना साकडे
खा. सुनील तटकरे यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिले आदेश

खैरवाडी क्रॉसिंग बंद न करण्यासाठी ग्रामस्थांचे खा. सुनील तटकरेंना साकडे
खा. सुनील तटकरे यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिले आदेश
नागोठणे | महेश पवार
मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम नागोठणे हद्दीत अंतिम टप्प्यात आले आहे. असे असतानाच नागोठण्याजवळील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील सुकेळी – खैरवाडी फाटा या ठिकाणी असलेले क्रॉसिंग बंद करण्याचा घाट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घातल्याने संतप्त झालेल्या खैरवाडी ग्रामस्थ व परिसरातील आदिवासी बांधवांनी लोकनेते व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची सुतारवाडी येथील “गीताबाग” मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात भेट घेऊन खैरवाडी फाट्या जवळील क्रॉसिंग बंद न करण्याची विनंती केली. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून शनिवार दिनांक २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता खैरवाडी फाटा येथे उपस्थित राहून स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी खैरवाडी फाट्याजवळ शनिवार दिनांक २५ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहणार असल्याने खैरवाडी ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानले आहेत.

यासंदर्भात खैरवाडी गावातील आदिवासी बांधवांनी लोकनेते, खासदार सुनील तटकरे यांना दिलेल्या निवेदनानुसार खैरवाडी गावाच्या नावाने असलेला बस स्टॉप व क्रॉसिंग मुंबई गोवा महामार्गाचे कंत्राटदार यांनी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात बंद केला आहे. त्यामुळे खैरवाडी, मांडवशेत, वाघ्रणवाडी, उसर नंबरवाडी तसेच पावसाळ्यात प्रसिद्ध अशा सुकेळी परिसरातील वरदायिनी धबधबा येथे येण्या – जाण्यासाठी या भागातील लोकांना व पर्यटकांना खैरवाडी फाट्या जवळ जाण्यासाठी खांब टोल नाका तसेच सुकेळी येथील जिंदाल कंपनी अशा लांबच्या ठिकाणी मोठा वळसा घालून यावे लागणार आहे. तसेच खैरवाडी फाट्याकडून येणारा रस्ता हा मोठ्या ओढ्याकडून येत असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पाणी येत आहे. त्यामुळे या ओढ्यालगत संरक्षण भिंत बांधण्याची मागणीही खैरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

यावेळी खैरवाडी व परिसरातील आदिवासी वाड्यातील ग्रामस्थांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, ऐनघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच भगवान शिद, सामाजिक कार्यकर्ते जानू वारगुडे आदींसह खैरवाडी, मांडवशेत, वाघ्रणवाडी, उसर नंबरवाडी या भागातील ग्रामस्थ व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





