एस टी चालक व वाहकांना नागोठण्याचे वावडे

कोकणात जाणाऱ्या एस टी चालक व वाहकांना नागोठण्याचे वावडे
महामार्गावर हायवेनाका येथे सर्व्हिस रोडवर न थांबता उड्डाणपुलावरून चालक करताहेत हवाई सफर
माणगाव, श्रीवर्धन, महाड व पोलादपूर आगारच्या एस.टी. बसेसचा समावेश
नागोठण्यातील प्रवासी व विद्यार्थ्यांतून तीव्र संताप
नागोठणे | महेश पवार
रायगड जिल्ह्यातील महत्वाचे व मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागोठण्यात सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या कोकणात जाणाऱ्या काही एस टी गाड्या नागोठण्यात न थांबता नागोठण्यातील उड्डाण पुलावरून हवाई सफर करीत जात आहेत. त्यामुळे मुंबई, पनवेल वरून येणाऱ्या प्रवाशांचे तसेच नागोठण्यात कोकण एज्युकेशन सोसायटी व भारतीय एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध प्रकारचे उच्च शिक्षण घेण्यासाठी येणारे व नागोठण्यावरून कोलाड, माणगावकडे जाणारे येथील मोठ्या संख्येतील महाविद्यालयीन विद्यार्थी व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. एस टी चालक व वाहकाच्या या गैरवर्तणुकीकीमुळे नागोठण्यातील प्रवासी व स्थानिक नागरिकांतून एस टी च्या चालक व वाहकांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नागोठणे हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे नागोठणे हायवेनाका येथील उड्डाण पूल वाहतुकीस खुला होण्यापूर्वी हायवेनाका येथे एस टी च्या कोकणात व मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्या प्रवाशांसाठी थांबविण्यात येत होत्या. मात्र सद्य स्थितीत नागोठण्यातील हायवेनाका येथील उड्डाण पूल पनवेल, मुंबईकडे व कोकणात जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी काही दिवसांपूर्वीच खुला करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी नागोठण्यातील हायवेनाका येथील उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व्हिस रोड वरूनच मुंबई व कोकणात जाणाऱ्या एस टी चालकांनी गाडी नेणे बंधनकारक असताना राज्य परिवहन महामंडळाच्या माणगाव, महाड, श्रीवर्धन व पोलादपूर व कोकणातील काही एस टी आगाराच्या काही बसेस सर्व्हिस रोडवरून येत नाहीत. या बसेस परस्पर हायवेनाका येथील उड्डाण पुलावरून जात आहेत. उड्डाण पुलावरून महाडकडे जाणाऱ्या या एस टी बसेस नागोठण्यातील प्रवाशांना उड्डाण पुलाचे संपत असलेले आय टी आय कॉलेज समोर तर मुंबई कडे जाणाऱ्या एस टी बसेस नागोठण्यातील प्रवाशांना आंगर आळी येथे उतरत आहेत. त्यामुळे नागोठण्यातील प्रवाशांना एकतर पायी चालत किंवा रिक्षा करून आर्थिक भुर्दंड सहन करून नागोठण्यात जावे लागत आहे. त्यामुळे या बसेसना जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागोठणे शहराचे वावडे का ? असा प्रश्न उपस्थित करून प्रवाशांतून व नागोठणेकरांतून उपस्थित करून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशाप्रकारे काही वाहनचालकांचा आडमुठेपणा आजही सुरूच आहे. त्यामुळे या गाड्या एस टी चालकांची खासगी मालमत्ता आहे का ? असा प्रश्नही प्रवाशांतून उपस्थित होत आहे.

राज्य परिवहन महामंडळाचा कुणी चालक जर नागोठणे हायवेनाका येथील सर्व्हिस रोडवरून गाडी न नेता उड्डाण पुलावरून गाडी नेत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच अशा वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी काही दिवस नागोठणे हायवेनाका येथील महामार्गावर आय टी आय कॉलेज समोर व आंगर आळी येथे एस टी चे भरारी पथक तैनात करण्यात येईल. – श्री. सुहास चौरे, रायगड जिल्हा वाहतूक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ




