E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआरोग्यमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
व्यावसायिकांनी घेतला कारवाईचा धसका
कारवाईच्या भीतीने नागोठणे शहरातील अनेक हॉटेल, मिठाई दुकाने दुकानदारांनी केली बंद

अन्न व औषध प्रशासनाचा नागोठण्यातील हॉटेल, मिठाई व इतर व्यावसायिकांनी घेतला धसका
कारवाईच्या भीतीने शहरातील अनेक हॉटेल, मिठाई दुकाने दुकानदारांनी केली बंद
नागोठणे | महेश पवार
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, महाराष्ट्रात भेसळखोरांविरुद्ध आणि नियम भंग करणाऱ्यांविरुद्ध एक धडक मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या नेतृत्वात राज्यभरात अनेक ठिकाणी धडाकेबाज कारवाई सुरू आहे. अशाचप्रकारे कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची टीम नागोठण्यात येणार असल्याची माहिती येथील व्यावसायिकांना मंगळवारी (दि.२१) सकाळी मिळाली. त्यानंतर ही माहिती सर्वत्र पसरताच नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, बाजारपेठ, खुमाचा नाका, तसेच महामार्गावरील अनेक हॉटेल व्यावसायिक, मिठाई दुकानदार, दूध डेअरी, खाद्य पदार्थांचे छोटे छोटे दुकानदार तसेच अन्य काही दुकानदारांनी कारवाईच्या भीतीपोटी, घाबरून जाऊन आपापली दुकाने बंद ठेवली होती.

यासंदर्भात हॉटेल, मिठाईवाले व अन्य दुकाने असलेल्या परिसरात माहिती घेतली असता तेथील विविध प्रकारची अनेक दुकाने बंद असलेली
दिसून आली. विशेष करून हॉटेल व्यावसायिकांनी याचा धसका घेतल्याचे दिसून आले. येथील हॉटेल व मिठाई दुकानदारांनी आपापली हॉटेल्स सकाळी सुरू केली असली तरी अन्न व औषध प्रशासनाची टीम येणार असल्याची माहिती मिळताच हॉटेल व्यवसायात काहीनाकाही उणिवा नक्कीच सापडू शकत असल्याने त्यांनी आपली दुकाने दुपारी १२ नंतर बंद करणे पसंत केले. मात्र भीतीपोटीने दुकाने बंद करण्यात आली असली तरी, यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने दुकाने बंद आलेल्या परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली असता दुपारी २ वाजेपर्यंत तरी अन्न व औषध प्रशासनाची कोणतीही टीम नागोठण्यात आली नसल्याचे आणि कुणावरही कारवाई झाली नसल्याचे दिसून आले. मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीने दुकानदार दुकाने बंद करीत असतील तर नक्की काय गौडबंगाल आहे याची चर्चा नागरिकांतून होत आहे.

एफ. डी. ए. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात केलेल्या कारवाया :
तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाच्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ११०० हून अधिक छापे टाकले आहेत. २५ मे २०२६ नंतर अनेक अन्न व्यावसायिकांच्या ठिकाणी ११०० हून अधिक रेड करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भेसळयुक्त वस्तू जप्त करणे, लाखो लिटर नकली दूध, कित्येक टनाचे भेसळयुक्त पनीर आणि शिर्डीमध्ये भेसळयुक्त प्रसाद सुद्धा जप्त आणि नष्ट करण्यात आला आहे. खाद्यतेल कारवाई करतांना छत्रपती संभाजी नगरमध्ये २.९३ कोटी रुपये किमतीचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त करून युनिट सील करण्यात आले आहे. तसेच नागरिकांसाठी अन्न व औषधांच्या बाबतीत तक्रारीसाठी एक नवीन AI-सक्षम तक्रार पोर्टल सुरू करण्यात आले आहे.




